स्टारयुग लाईव्ह : मोरगाव ( राहुल तावरे )
कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या गाव पातळीवरील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनाकडून प्रोत्साहन भत्ता देण्याचे आदेश नुकतेच देण्यात आले आहेत. या आदेशाचे पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघ संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याची माहिती संघटनेचे प्रसिद्ध प्रमुख राहुल तावरे यांनी दिली.
सन 2019 साली कोरोना सारख्या महाभयंकर रोगाने संपूर्ण देशात धुमाकूळ घालून संपूर्ण वातावरण हा धरून सोडले होते. या काळात संपूर्ण देशातील जनजीवन ठप्प होऊन मोठ्या जीवितहानीला सामोरे जावे लागले होते. या काळात आरोग्य विभागाच्या मदतीला अनेक छोट्या-मोठ्या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवून या संकटाचा सामना केला होता. यामध्ये आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी तलाठी,ग्रामसेवक, कोतवाल, आशासेविका, शिक्षक यांच्याबरोबर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी ही मोलाची कामगिरी बजावली होती.
याच महामारी असलेल्या कोरोना रोगाच्या काळात स्वच्छता, आरोग्य तपासणी, लसीकरण मोहीम, नागरिकांना आवश्यक सेवा सुविधा, औषध फवारणी, आधी महत्त्वपूर्ण कामे स्वतःच्या जीवाची परवा न करता जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या कार्याची शासनाकडून नुकतीच दखल घेण्यात आली आहे. तब्बल पाच वर्षानंतर शासनाकडून गाव पातळीवरील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ग्रामनिधी अथवा पंधराव्या वित्त आयोगातून प्रोत्साहन भत्ता देण्याचे आदेश नुकतेच देण्यात आले आहेत. या आदेशामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघ संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने या आदेशाचे स्वागत केले आहे.
शासन परिपत्रकानुसार दरमा 1000 रुपये प्रमाणे 23 महिन्यांचे एकूण प्रत्येक कर्मचाऱ्यास 23 हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे आदेश 30 सप्टेंबर 2025 रोजी बारामती पंचायत समितीचे गट विकास अधिकारी किशोर माने यांनी परिपत्रकद्वारे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना काढले आहेत. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर माने यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घेऊन तत्काळ आदेश काढल्याने कर्मचाऱ्यांच्या समाधानाचं व आनंदाचे वातावरण आहे.
























